विदर्भ, कोकणात सर्वदूर पावसाची शक्यता
पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात अनेक पाऊस पडत आहे. उद्या (ता.३१) कोकण, विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर आहे. तर मध्य उत्तर प्रदेशमध्ये नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राज्यस्थानच्या गंगानगरपासून या दोन्ही कमी दाब क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. अरबी समुद्रात किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.
पश्चिम बंगालमधील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे भारताकडे सरकत आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, उद्या (ता.३१) कोकणातील रत्नागिरी, रायगड, तसेच पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.