पुणे : पावसात मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता पावसाला पोषक हवामान होत असून, अनेक भागात ढगाळ हवामान होऊ लागले आहे. उद्या (ता.७) राज्याच्या अनेक भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जवळपास दोन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्या नंतर नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुरूवारपासून (ता.८) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. यातच बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत (ता. ११) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
उद्यापासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जिल्हानिहाय पावसाचा विचार करता उद्या (ता. ७) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा