देशाच्या बहुतांशी भागात पोचला मॉन्सून

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) प्रगती मंद गतीने सुरू आहे. शनिवारी (ता. १९) मॉन्सूनने गुजरात, मध्य प्रदेशासह देशाच्या बहुतांशी भागात प्रगती केली आहे. मात्र पुरेसे पोषक हवामान नसल्याने राजधानी दिल्लीसह देशाच्या वायव्य भागातील मॉन्सूनचे आगमन लांबले आहे.

मॉन्सूनने शनिवारी (ता.१९) संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व्यापून, उत्तर प्रदेशचा बहुतांशी भाग, तसेच राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. बारमेर, भिलवाडा, अलिगड, आंबाला, अमृतसरपर्यंतच्या भागात मॉन्सूनने मजल मारली आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरणीय स्थिती नसल्याने राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये मॉन्सूनची पुढील वाटचाल काहीशी मंद गतीने होणार आहे.

नकाशातील हिरवी रेषा मॉन्सूनची वाटचाल दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग)

उत्तर भारतात मॉन्सूनचे आगमन रेंगाळले असलेतरी दीर्घकालीन आगमनाच्या वेळा विचारात घेता, यंदा मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने झाला आहे. जम्मू काश्मीरसह देशाच्या उत्तर भारतात ३० जूनपर्यंत पोचणारा मॉन्सून यंदा १७ दिवस आधीच (१३ जून) या भागात पोचला. तर राजस्थानच्या पश्चिम भागात ५ जुलैपर्यंत पोचणारे मोसमी वारे यंदा १९ जून रोजी दाखल झाले आहे.

पुढील आठवड्यात पाऊस वाढणार
राज्याच्या विविध भागात मॉन्सूनच्या सरीवर सरी कोसळत आहेत. रविवारी (ता. २०) कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारपासून (ता. २१) कोकण वगळता उर्वरीत राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कोकण आणि पूर्व विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरीत राज्यात गुरूवारपर्यंत (ता. २४) पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. तर पुढील आठवड्यात (२५ जून ते १ जुलै) या काळात राज्यात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

नकाशा : पुढील दोन आठवड्याचा पावसाचा अंदाज (सौजन्य -हवामान विभाग )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *