पुणे : अरबी समुद्रात आलेले “ताऊते” चक्रीवादळ निवळते तोच बंगालच्या उपसागरात “यास” चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या वादळी प्रणालीची तीव्रता वाढत असून, ते बुधवारपर्यंत (ता. २६) पश्चिम बंगाल,ओडिशाच्या किनाऱ्याला धडकण्याची इशारा देण्यात आला आहे. मॉन्सून वाऱ्यांनी संपुर्ण अंदमान, निकोबार बेटे व्यापली असून, प्रगतीची सीमा कायम आहे.
बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. सोमवारी (ता. २४) सकाळी त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. हे वादळ ओडीशाच्या परादीपपासून ५३० किलोमीटर तर पश्चिम बंगालच्या दिघापासून ६२० किलोमीटर अग्नेयेकडे समुद्रात आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकताना आधिक तीव्र होणार असून, बुधवारपर्यंत (ता. २६) ओडिशा, पश्चिम बंगाल, बांग्लादेशच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत आहेत.
बंगालच्या उपसागरातील वादळे मॉन्सूनसाठी पोषक ठरतात. या वादळापुर्वी बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचे प्रवाह बळकट होऊन मॉन्सूनचा वेगाने प्रवास सुरू झाला आहे. पुढील काळात या वादळाचा मॉन्सूनवर काय प्रभाव पडेल हे पाहणे औतुक्याचे ठरणार आहे. मॉन्सून ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.