“यास” चक्रीवादळाची तीव्रताही वाढली; पूर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा
पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या “यास” चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मॉन्सूनची वाटचाल सुरूच आहे. आज (ता.२५) मॉन्सूनने बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातून पुढे चाल केली आहे. निम्मा श्रीलंका देश व्यापून, मालदीव आणि कोमोरीन भागात मॉन्सून दाखल झाला आहे. यास चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, उद्या (ता.२६) दुपारपर्यंत ते पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी (ता. २१) अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी मुसंडी मारत मॉन्सूनने संपुर्ण अंदमान, निकोबार बेटसमुह व्यापला असून, श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरही मॉन्सून दाखल झाला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊन “यास” चक्रीवादळ तयार झाले.
हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असल्याने मॉन्सूनचे प्रवाहही सक्रीय झाले आहेत. मंगळवारी (ता.२५) मॉन्सूनने निम्मा श्रीलंका देश व्यापला आहे. अरबी समुद्रातील मालदीव कोमोरीन भागासह, बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. मॉन्सूनची वाटचाल सुरूच राहणार असून, ३१ मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. सोमवारी (ता. २४) सकाळी त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले. या वादळाची तीव्रता वाढत असून, मंगळवारी सकाळी ते वादळ ओडीशाच्या परादीपपासून २८० किलोमीटर तर पश्चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या सागर बेटांपासून ३८० किलोमीटर दक्षिणेकडे समुद्रात आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकताना आधिक तीव्र होणार असून, बुधवारपर्यंत (ता. २६) ओडिशा, पश्चिम बंगाल, बांग्लादेशच्या किनाऱ्याजवळ जमीनीवर येण्याचे संकेत आहेत.