निफाडमध्ये ६ अंश, तर परभणीत ८.७ अंशांची नोंद

पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड व कोरड्या हवेमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी (ता.८)राज्यातील निचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राजस्थानच्या पूर्व भागातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या राज्यात आलेली थंडीची लाट ओसरणारची शक्यता असल्याने राज्याच्या किमान तापमानातही वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. पुणे, मालेगाव, नाशिक, नागपूर येथे तापमान १० अंशांच्या खाली घसरले. तर जळगाव, औरंगाबाद, ब्रह्मपूरी, गोंदिया, अकोला, वर्धा येथे तापमानाचा पारा ११ अंशांच्या खाली आला.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोमवारी (ता. ८) नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९.६, जळगाव १०.२, कोल्हापूर १७.२, महाबळेश्वर १२.४, मालेगाव ९.६, नाशिक ९.२, सांगली १६.९, सातारा १४.०, सोलापूर १४.९, मुंबई (कुलाबा) २१.२, सांताक्रूझ १८.०, रत्नागिरी २२.१, डहाणू १६.९, औरंगाबाद १०.५, परभणी ११.३, नांदेड १३.५, उस्मानाबाद १२.१, अकोला १०.८, अमरावती ११.२, बुलढाणा १३.३, ब्रम्हपुरी १०.३, चंद्रपूर ११.२, गोंदिया १०.५, नागपूर ९.४, वाशीम १६.८, वर्धा १०.९.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *