“गती, निवार” पाठोपाठ पुन्हा होतेय चक्रीवादळाची निर्मिती
पुणे : देशाच्या दक्षिणेकडील समुद्रात वादळामागुन वादळांची साखळी सुरूच राहणार आहे. गेल्या दोन आठवड्यात आलेल्या “गती” आणि “निवार” वादळांपाठोपाठ पूर्व किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपर्यंत (ता.१९) श्रीलंकेलगतच्या हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, भारताकडे येताना त्याची तीव्रता वाढत जाणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
अग्नेय अरबी समुद्रात तयार झालेले “गती” चक्रीवादळ सोमालियाकडे सरकून रास बिन्नाहजवळ निवळून गेले. “गती” तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात मंगळवारी (ता. २४) आलेल्या “निवार” चक्रीवादळाने तामिळनाडू आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला तडखा दिला. जमीनावर येताच हे वादळ निवळू लागले. शुक्रवारी (ता. २७) आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होते.
दरम्यान विषुवृत्ताजवळील हिंद महासागर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारपर्यंत (ता. २९) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तीव्रता वाढून ही वादळी प्रणाली २ डिसेंबर दरम्यान तामिळनाडूच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही प्रणाली अरबी समुद्राकडे येणार असून, त्या पाठोपाठ बंगालच्या उपसागरात पुन्हा नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.