पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २८) सुरू केलेला परतीचा प्रवास सुरूच आहे. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत परतीच्या प्रवासाला सुरूवात करणाऱ्या मॉन्सूनने शनिवारी (ता.३) राजस्थानचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
पावसाने दिलेली उघडीप, वाऱ्यांची बदललेली दिशा, हवेतील आलावा (आर्द्रता) कमी झाल्याने मॉन्सूनने मॉन्सून वायव्य भारतातून माघार घेतली आहे. उत्तर प्रदेशातील बहारीच, मध्य प्रदेशातील ग्वालियर, राजस्थानच्या सवाई माधवपूरपर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने झाला आहे. देशाच्या इतरही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान होत आहे.