डॉ. विश्वजित कदम यांची माहिती
मुंबई : कोवीड-१९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीची चाचणी भारती हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कदम म्हणाले की, जगभरात कोवीड १९ वर लस शोधण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा कोरोनावर लसची निर्मिती सुरू आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट व आयसीएमआरच्या वतीने देशभरातील १५ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. यात पुण्यातील भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल हे पश्चिम क्षेत्रातील एकमेव हॉस्पिटल आहे.
सिरम इन्स्टिट्यूट व आयसीएमआरच्या माध्यमातून कोवीड लसीच्या चाचणीसाठी पाच जणांची निवड करण्यात आली असून हे स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. आयसीएमआरच्या निकषानुसार ही निवड झाली असून, त्यांच्यावर पहिली आरटीसीपीआर चाचणी केली जाणार आहे. तंदुरुस्त व कोरोना निगेटिव्ह आहे, त्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर कोवीड १९ पॉझिटिव्ह असलेल्यांनाही लस देण्यात येणार आहे. या पाचही जणांच्या तब्येतीवर भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय टिम व आयसीएमआरचे संशोधक पुढील सहा महिने लक्ष ठेवणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.