उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
पुणे : मुळशी धरणातून नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळावे. तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबवण्यासाठी सुर्वे समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
विधानभवन सभागृहात शुक्रवारी (ता. २५) रोजी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सचिव अविनाश सुर्वे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विलास राजपूत, अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरणजीत शिवतरे आदी उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील २४ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मुळशी व कासारसाई धरणातून पाणीसाठा त्वरित उपलब्ध करण्यासाठी निर्देश दिले, तसेच या गावाच्या पाणीपुरवठा योजनेचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या फेर सर्वेक्षण करून सादरीकरण करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत. सभापती बाबा कंदारे , महादेव कोंढरे, सुनील चांदेरे, राजेश ढमाले, माऊली कांबळे, सुहास दगडे, माऊली साठे यावेळी उपस्थित होते.