पुणे : राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र अनेक भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. रविवारी (ता.११) उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह बळकट झाले आहेत. या दोन्ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम राजस्थानपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रीय आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात हवेचे पुर्वपश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. यातच अरबी समुद्रावरून वाऱ्यांचे प्रवाह वाढू लागले आहेत. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरीत राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. ११) सकाळपर्यंत यवतमाळ, अमरावतीसह विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग)
कोकण :
पालघर : वसई ४१,
रायगड : श्रीवर्धन ६५,
रत्नागिरी : गुहागर १००, हर्णे ७२, राजापूर ४१, रत्नागिरी ५८.
सिंधुदुर्ग : देवगड ४५, कणकवली ४५.
मध्य महाराष्ट्र :
धुळे : धुळे ५०,
कोल्हापूर : गगणबावडा ६९,
पुणे : इंदापूर ३९.
मराठवाडा :
जालना : भोकरदन ३६.
नांदेड : माहूर ४९.
उस्मानाबाद : भूम ३३, परांडा ३५, उमरगा ४०.
परभणी : परभणी ४४.
विदर्भ :
अकोला : मर्तिजापूर ५३, पातूर ३६.
अमरावती : अंजणगाव ४८, बटकुली ८५, दर्यापूर ४८.
चंद्रपूर : जेवती ३७, कोर्पणा ४४.
नागपूर : नागपूर ४३.
वर्धा : देवळी ३७, समुद्रपूर ३८, सेलू ४६, वर्धा ३५.
वाशिम : मालेगाव ५५.
यवतमाळ : अर्णी ७५, बाभुळगाव ४६, दारव्हा ९४, दिग्रस ६५, कळंब ३८, वणी ४०, झारीझामणी ३६.
दिल्लीतील मॉन्सूनचे आगमन नाहीच
दिल्लीसह वायव्य भारतातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबले आहे. १० जुलै रोजी मॉन्सून दिल्लीत दाखल होण्याची शक्यता होती. मात्र अद्यापही मॉन्सूनची प्रगती झालेली नाही. बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वायव्य भारताकडे येऊ लागल्याने मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान तयार झाले आहे. हे वारे दिल्ली, हरियाणा, पूर्व राजस्थानपर्यंत पोचले आहेत. या भागात आर्द्रता देखील वाढली आहे. उद्यापर्यंत (ता. १२) दिल्लीसह वायव्य भारतात प्रगती करण्याची शक्यता आहे.
हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा