पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) ऑगस्टअखेरपर्यंत राज्यात ८४३.८ मिलीमीटर (२ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दडी मारल्या पावसाने विदर्भात उणे १४ टक्के नोंद झाली असून, उर्वरीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही कशीबशी सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात सरासरी ८२४.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जून, जूलैपाठेपाठ ऑगस्ट महिन्यातही पावसात मोठे खंड पडल्याने अनेक भागात पावसाचे प्रमाण कमीच आहे. मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला असून, तेथे ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत ५९७.४ मिलिमीटर (१९ टक्के अधिक) पाऊस पडला आहे. तर कोकणात २७९२.५ मिलिमीटर (११ टक्के अधिक), मध्य महाराष्ट्रात ६१४.६ मिलिमीटर (३ टक्के अधिक), तर विदर्भात ६७२.१ मिलिमीटर (१४ टक्के कमी) पावसाची नोंद झाली आहे.

जून आणि जुलै महिन्यात मोठे खंड पडूनही मराठवाड्यात दमदार पाऊस झाला होता. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला होता. विदर्भातही सरासरी इतका पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यासह संपुर्ण हंगामात उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यासह या जिल्ह्यांचा घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्र पावसाचे प्रमाण कमी आहे. विदर्भात पावसाची सर्वाधिक ओढ असल्याचे दिसून आले आहे. जवळपास महिनाभरापेक्षा अधिक काळ पावसाचा हंगाम शिल्लक असून, या काळात चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.
पावसासाठी पोषक हवामान प्रणालींचा अभाव
ऑगस्ट महिन्यात मात्र राज्यात पावसाचे प्रमाण खुपच कमी दिसून आले. अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह कमजोर राहणे, उत्तरेकडे गेलेला मॉन्सूनचा आस, पुरेशा कमी दाब क्षेत्रांची निर्मिती न होणे, किनारपट्टीला समांतर कमी दाब पट्टा आदी पोषक हवामान प्रणालींच्या अभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. महिन्याच्या अखेरच्या पंधरवाड्यात दोन कमी दाब क्षेत्र तयार झाली, त्यामुळे पाऊस वाढला. मात्र या प्रणालींचा प्रभाव आणि पाऊस फार काळ टिकला नाही.

अनेक जिल्ह्यात कमी पाऊस
जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची विचार करता, यंदा ऑगस्टअखेर पावसाने सरासरी गाठल्याचे चित्र असले तरी अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. बीड जिल्ह्यात सरीसरीपेक्षा ४१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३९ टक्के अधिक पावसाची, परभणी ३५ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर नगर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडूनही सुरवातीला झालेल्या पावसाने हंगामात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात यंदा सर्वात कमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत उणे ४६ टक्के, विदर्भातील अमरावती जिल्ह्यात उणे २८, गोंदिया उणे २५ टक्के, गडचिरोली उणे २४ टक्के, तर बुलडाणा उणे २१ टक्के पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

देशात उणे ९ टक्के पावसाची नोंद
यंदाच्या मॉन्सून हंगामात देशात पाऊस कमी असल्याचे चित्र आहे. ऑगस्टअखेरपर्यंत देशात सरासरी ७१०.४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र ६४४.९ मिलीमीटर ( उणे ९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. देशातील ३६ प्रमुख हवामान विभाग विचारात घेता, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, रायलसिमा, तामिळनाडू राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर केरळ, ओडिशा, गुजरात, सौराष्ट्र, पश्चिम राजस्थान, पंजाब, जम्मू कश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्वोत्तर राज्यांचा दक्षिणेकडील भाग येथे सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
