कधी होणार पावसाला सुरूवात ?
अमोल कुटे
पुणे : मॉन्सूनचा जोर ओसरल्याने राज्यात आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या भागात या उघडीपीने चिंता अधिकच वाढली आहे. राज्यात पुढील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, दुसऱ्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरूवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर तुफान कोसळल्यानंतर गेल्या आठवडाभरात जोर कमी होत पावसाने उघडीप घेतली. कोकणासह नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या धो-धो पावसाने रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूर स्थिती ओसरली. तर दुसरीकडे उत्तर मध्य महाराष्ट्रात यंदा अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
२९ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र, गुजरातसह पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण खुपच कमी झाले आहे. तर उत्तरेकडील राज्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्राच्या चारही विभागात पावसात पुन्हा खंड पडला आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यात खुपच कमी पाऊस पडला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (६ ते १२ ऑगस्ट) राज्यात पावसाची दडी कायम राहणार आहे. अनुकुल हवामान नसल्याने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
दुसऱ्या आठवड्यात (१३ ते १९ ऑगस्ट) राज्याच्या बहुतांशी भागात पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहणार आहे. तर उर्वरीत राज्यात आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकणात जोरदार पाऊस पडणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.