पावसाची उघडीप कायम राहणार
पुणे : मॉन्सून सक्रीय होण्यासाठी अनुकूल हवामान नसल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. बहुतांशी भागात आणखी आठवडाभर पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.५) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तसेच उर्वरीत राज्यात हलक्या सरींसह हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वायव्य मध्य प्रदेशात हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर आला आहे. राजस्थानच्या गंगानगर पासून कमी दाब क्षेत्राच्या केंद्रामधून वाराणसी, पाटणा, शांतिनिकेतन, उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सुरू असलेला पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ७ ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. ओडिशा वगळता मध्य भारत, महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील आठवडाभर पावसाची दडी कायम राहणार आहे.
पावसाची उघडीप असल्याने राज्याच्या अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उद्या (ता.५) उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत वाहणारे जोरदार वारे वाहणार आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरीत राज्यात हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :
कोकण :
पालघर : वसई ३१,
रायगड : कर्जत ३७, माथेरान ५२, रोहा ३६,
रत्नागिरी : चिपळूण ३८, गुहागर ४७, लांजा ४२, मंडणगड ४२, राजापूर ३८, रत्नागिरी ४७, संगमेश्वर ६१,
सिंधुदुर्ग : दोडामार्ग ५१, कणकवली ५०, कुडाळ ३४, मुलदे ४०, रामेश्वर ३५, वैभववाडी ४०.
ठाणे : ४१, भिवंडी ३१, उल्हासनगर ५०.
मध्य महाराष्ट्र :
कोल्हापूर : गगणबावडा १०१, पन्हाळा ३०, राधानगरी ४०, शाहुवाडी ३०.
नाशिक : इगतपुरी ६७.
सातारा : महाबळेश्वर ९५, पाटण ३५.