पुणे : राज्यात पावसाने मारलेली दडी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या उघडीपीने उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. उद्या (ता.११) मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. नैर्ऋत्य राजस्थानातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून अरूणाचल प्रदेशपर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनच्या आसाचे पश्चिम टोक सर्वसाधारण स्थितीत आहे. तर पूर्व टोक हिमालयाच्या पायथ्याकडे गेले आहे.
राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने तापामानाचा पारा ३० ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे सर्वाधिक ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. तर परभणी, बीड, वर्धा, चंद्रपूर येथेही तापमानाचा पारा ३४ अंशांच्या वर सरकला आहे.
राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांपर्यंत वाढ झाली. उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाडाही असह्य होऊ लागला आहे. उद्या (ता. ११) मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह, मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.