पुणे : पावसाच्या दडीने राज्यात शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. राज्याच्या बहुतांशी भागात आणखी काही दिवस पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या (ता.१०) विदर्भ मेघगर्जना, विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
मध्य प्रदेशात असलेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेल्यानंतर उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. नैर्ऋत्य राजस्थानातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून अरूणाचल प्रदेशपर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनच्या आसाचे पश्चिम टोक सर्वसाधारण स्थितीत आहे. तर पूर्व टोक हिमालयाच्या पायथ्याकडे गेले आहे.
राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने तापामानाचा पारा ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे सर्वाधिक ३४.८ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली. तर जळगाव, सोलापूर, नांदेड, बीड, परभणी, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये तापमान ३४ अंशांपार गेला आहे.
अनेक ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांपर्यंत वाढ झाली असून, उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाडाही असह्य होऊ लागला आहे. उद्या (ता. १०) विदर्भात विजा, मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह, मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.