पुणे : सोयाबीन हे राज्यातील प्रमुख खरीप पीक असून, मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड होते. गेल्या वर्षी सोयाबीन पिकावर खोडमाशी तसेच भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक वाळून जाण्याबरोबरच उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपायोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

खोडमाशी

खोडमाशीची प्रौढअवस्था म्हणजेच माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची व आकाराने लहान म्हणजेच २ मी.मी. असते. या किडीची अंड्यातून निघालेली बिन पायाची अळी फिकट पिवळसर रंगांची असते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या प्रथम सोयाबीनची पाने पोखरतात. पानांच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खातात. अशा प्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास आतमध्ये पांढूरकया रंगाची अळी किंवा कोष आढळतो.

या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्थेत झाल्यास म्हणजे सोयाबीनची पेरणीनंतर १० ते १५ दिवसाचे पिक असताना झाल्यास, प्रादुर्भाव ग्रस्त झालेले झाड वाळते व झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होते. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणी करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. रोपावस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सोयाबीनचे पीक मोठे झाल्यावर या किडीच्या प्रादुर्भावामुळे असा परिणाम दिसत नाही. खोडमाशी ने कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याच्या वजनात घट होऊन उत्पादनात १६ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट येऊ शकते.

सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास खालील उपाययोजना करावी.

  • जेथे या किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो प्रति हेक्‍टर जमिनीत ओल असताना टाकावे.
  • कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
  • सोयाबीन पिकात खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पीक उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी प्रति हेक्‍टर २५ पिवळे चिकट सापळे लावावेत.
  • खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, भरपूर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात म्हणून अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी या संदर्भात जागरूक राहून वेळोवेळी निरीक्षण घ्यावीत.
  • पेरणीपूर्वी सोयाबीन पिकात काही कारणास्तव थायमेथोक्झामची बीजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पीक १५ दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन ५०% – ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ % – ६.७ मिली किंवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ % -३.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
चक्री भुंगा

चक्री भुंगा ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पुर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाय योजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

सोयाबीनवरील चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास खालील उपाययोजना करावी.

  • ​पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्या च्या आत पूर्ण करावी.
  • पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणे वापरावे. दाट पेरणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • जेथे चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे.
  • चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
  • यापद्धतीचा १५ दिवसातून जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते.
  • चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये याकरिता सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • पीक पेरणीच्या 30-35 दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच ७-१० दिवसात ट्रायझोफॉस ४० ई. सी. १६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ एस. सी. 3 मिली मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ % + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ % झेड. सी २.५ ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *