पुणे : दोन दिवस वेग मंदावलेल्या मॉन्सूनने पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. आज (ता. ९) मॉन्सूनने मुंबईसह संपुर्ण कोकण, मराठवाडासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपुर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वेळेआधीच (६ जून) दाखल होणाऱ्या मॉन्सूनने त्यानंतर दोन दिवस कोणतीही वाटचाल केली नव्हती. वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सक्रीय झाल्याने मुंबई, कोकण, मराठवाडा, तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे.
आज (ता. ९) मॉन्सूनने गुजरातच्या वलसाड, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, विदर्भातील नागपूरपर्यंत मजल मारली. आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता.११) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अंदमान बेटांसह केरळातील आगमन लांबल्याने मॉन्सून गुरूवारी (ता. ३) दक्षिण केरळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. रविवारी (ता.६) तब्बल चार दिवस आधीच पुण्यात हजेरी लावली होती. हवामान विभागाच्या सुधारीत अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.