पुणे : राज्यात पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे खरीप हंगाम पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे. विजेत्या शेतकऱ्यांना परितोषिके देण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कृषि आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२१ साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके :

भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी(रागी), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल

पीक स्पर्धेच्या नियम व अटी

  • पीकस्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल.
  • प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या : सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५
  • पीकस्पर्धा मध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
  • पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.
  • तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या : सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४
  • स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकर्‍याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. 
  • प्रवेश शुल्क : सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये ३००/-

अर्ज दाखल करण्याची तारीख

  • मूग व  उडीद पीक : ३१ जुलै 
  • भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल : ३१ ऑगस्ट 

असा करा अर्ज

पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, ७/१२, ८अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात द्यावे. स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

पीकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप

स्पर्धा पातळीपहिलेदुसरेतिसरे
तालुका पातळी५ हजार रुपये३ हजार रुपये२ हजार रुपये
जिल्हा पातळी१० हजार रुपये७ हजार रुपये५ हजार रुपये
विभाग पातळी२५ हजार रुपये२० हजार रुपये१५ हजार रुपये
राज्य पातळी५० हजार रुपये४० हजार रुपये३० हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *