पुणे : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही कोविड – १९ चा शिरकाव झाल्याने हजारो शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. कोरोनामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा समावेश करावा, अशी मागणी लाभ द्यावा, औरंगाबादच्या चिकलठाणा येथील ॲड. संध्या भुषण पाटील यांनी केली आहे.
ॲड. पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून मागणी ही केली आहे. मागील दीड वर्षापासून संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्रात कोविड-१९ च्या महामारीचा हाहाकार सुरु आहे. ग्रामीण भागालाही त्याची झळ बसली असून, त्यात अनेक कुटुंबांचे छत्र हरवले गेले. असंख्य शेतकरी कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने त्या कुटुंबातील सदस्य हवालदिल झालेले आहेत.
मागील दीड वर्षापासून सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळात शेतीमालाला भाव मिळालेला नाही. त्यात आजारपणाने औषध उपचारासाठी स्थानिक पातळीवर झालेला खर्च, शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झालेला होताच त्यात कुटुंबप्रमुखाचे व व्यक्तीचे झालेले निधन झाल्याने संपुर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. यातून शेतकरी कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने पीक विमा, पीक कर्ज आदी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेतलेले आहेत. आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत कोविड -१९ च्या महामारीत मयत शेतकऱ्यांचा समावेश करून त्यांना विमा छत्र प्रदान करावे. या महामारीत शेतकरी कुटुंबास आर्थिक हातभार देण्यास मदत करावी, अशी विनंती ॲड. संध्या भुषण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रातून केली आहे.