‘ताऊते’ चक्रीवादळ मंगळवारी पहाटे किनाऱ्याला धडकणार
पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या “ताऊते” चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीकडे झेपावणारे हे वादळ मंगळवारी गुजरातच्या पोरबंदरजवळ जमीनीवर येण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्याला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहेत.
लक्षद्वीप बेटांजवळ शुक्रवारी (ता. १४) तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून “ताऊते” चक्रीवादळाची निर्मिती झाली. पश्चिम किनारपट्टीलगतच्या समुद्रातून ही प्रणाली उत्तरेकडे सरकत आहे. रविवारी सकाळी या वादळाचे केंद्र गोव्याच्या पणजीपासून पश्चिमेकडे १३० किलोमीटर, मुंबईपासून दक्षिणेकडे ४५० किलोमीटर, तर गुजरातच्या वेरावळपासून ७०० किलोमीटर अंतरावर होते. या वादळाची तीव्रता आणखी वाढून मंगळवारी (ता. १८) पहाटेपर्यंत पोरबंदर आणि महुवा (जि. भावनगर) दरम्यान किनाऱ्याला धडकण्याचे संकेत आहेत.
‘ताऊते’ वादळाच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. वादळामुळे समुद्रात ताशी १४५ ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ७५ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र खवळून उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळ आणि पावसामुळे घरांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतीपीके आणि फळझाडांनाही फटका बसणार आहे. वादळ प्रभावित भागात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.