पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) भारताकडे वाटचाल हळूहळू सुरूच आहे. आज (ता.२७) मॉन्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. “यास” चक्रीवादळ जमीनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. दक्षिण झारखंड आणि परिसरावर कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) सक्रीय आहे.
शुक्रवारी (ता. २१) अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी मुसंडी मारत मॉन्सूनने संपुर्ण अंदमान, निकोबार बेटसमुह व्यापला. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरही मॉन्सून दाखल झाला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात “यास” चक्रीवादळ तयार झाल्याने मॉन्सूनला चाल मिळली.
मंगळवारी (ता.२५) मॉन्सूनने निम्म्या श्रीलंकेसह अरबी समुद्रातील मालदीव कोमोरीन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागातही प्रगती केली होती. गुरूवारी (ता. २७) मालदीव कोमोरीन समुद्रासह श्रीलंकेचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मॉन्सूनची वाटचाल सुरूच राहणार असून, ३१ मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.