महाराष्ट्र, गुजरातच्या किनाऱ्याकडे उद्या येणार चक्रीवादळ
पुणे : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ शुक्रवारी तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्याची तीव्रता आणखी वाढून केरळ किनारपट्टीलगतच्या समुद्रात ‘ताऊते’चक्रीवादळ घोंगावू लागले आहे. पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली असून, ही वादळी प्रणाली उद्यापर्यंत (ता.१६) महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीकडे येण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
लक्षद्वीप बेटांजवळ असलेले तीव्र कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत असताना. शुक्रवारी रात्री त्याचे चक्री वादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ पहाटे अमन दिवीपासून १०० किलोमीटर, तर केरळच्या कन्नूरपासून २९० किलोमीटर वायव्येकडे, तसेच गुजरातच्या वेरावळपासून दक्षिणेकडे १०१० किलोमीटर अंतरावर होते. आज (ता.१५) दुपारी साडेपाच वाजेपर्यंत केरळ किनाऱ्यालगत चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याकडे येताना या वादळाची तीव्रता अधिक वाढणार आहे. रविवारपर्यंत (ता. १६) हे वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात पोचेल. तर मंगळवारपर्यंत (ता. १८) हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत.
या वादळी प्रणालीच्या प्रभावाने आजपासून (ता. १५) केरळ, तामिळनाडूमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक, गोवा आणि कोकणात रविवारी (ता. १६) अणि गुजरामध्ये सोमवारी (ता. १८) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मंबईसह कोकणात जोरदार पाऊस, तर घाटमाथा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून जाताना (ता. १६ व १७) मंबईसह, कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वारे वाहणार आहेत. मुंबई आणि कोकणात वाऱ्यांचा वेग ताशी ९० किलोमीटर त मध्य महाराष्ट्रात ताशी ६० किलोमीटरपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. वादळामुळे उंच लाटा उसळून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.