किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

पुणे : उत्तरेकडील राज्यातून थंड व कोरडी हवा महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गारठा कायम राहणार असला तरी सोमवारपासून (ता. ८) किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राजस्थानच्या पूर्व भागातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातही गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. आकाश निरभ्र झाल्याने दिवसा जाणवणारा उकाडाही कमी झाला आहे.

विदर्भात किमान तापमानाचा पारा १० ते १४ अंशांच्या दरम्यान आहे. तर मध्य महाराष्ट्रात १० ते १८ अंश, मराठवाड्यात १२ ते १६ अंश, कोकणात १७ ते २२ अंशाच्या दरम्यान आहे. पुणे, जळगाव, नाशिक येथे तापमान १० अंशांच्या आसपास आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता. ७) नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.८, जळगाव १०.४, कोल्हापूर १८.०, महाबळेश्वर १३.६, मालेगाव ११.२, नाशिक १०.०, सांगली १६.३, सातारा १४.९, सोलापूर १६.२, मुंबई (कुलाबा) २२.२, सांताक्रूझ २२.०, रत्नागिरी २०.८, डहाणू १७.२, औरंगाबाद १२.५, परभणी १२.४, नांदेड १६.०, अकोला ११.३, अमरावती १३.४, बुलढाणा १४.०, ब्रम्हपुरी १२.७, चंद्रपूर १२.८, गोंदिया १०.२, नागपूर १४.१, वाशीम १६.०, वर्धा १३.२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *