मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा ( १२ वी) २३ एप्रिल तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) २९ एप्रिल पासून सुरु होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. गायकवाड बोलत होत्या. राज्याचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा मंडळ संचालक दिनकर पाटील उपस्थित होते.

प्रा. गायकवाड म्हणाल्या, इयत्ता 12 वी ची प्रात्यक्षिक परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान होईल तर लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल या दरम्यान होतील. तर लेखी परीक्षा २९ एप्रिल ३१ मे या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

कोविड १९ च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

शाळांमधील उपस्थिती वाढली

राज्यात इ. ९ वी ते इ.१२ वी च्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. १८ जानेवारी रोजी २१ लाख ६६ हजार विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. तब्बल २१ हजार २८७ शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सुमारे ७६.८ टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहितीही शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *