पुणे : विधान परिषद निवडणूकीसाठी मंगळवारपासून (ता.३) आचार संहिता लागु करण्यात आली आहे. या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभांमध्ये निवडणुक संबंधित घटकांबाबत सदस्यांना धोरणात्मक गोष्ट मांडता येणार नाही. तसेच आचार संहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार चंद्रकात पाटील यांची विधानसभेवर निवड झाल्याने ही जागा रिक्त झाली. तसेच पुणे शिक्षक मतदार संघासाठी निवडणुक होत आहे. ५ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर १७ नोव्हेंबर माघारीचा शेवटचा दिवस आहे. १ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

आचार संहिता काळात होणाऱ्या जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभेत पदवीधर आणि शिक्षक मतदार या निवडणुक संबंधित घटकांबाबत सदस्यांना धोरणात्मक गोष्ट मांडता येणार नाही. मांडायची असल्यास किंवा चर्चा करायची असल्यास त्याबाबत प्रत्यक्ष सभेत मुद्दा न मांडता गोपनीय लखोट्यात हा मुदा सदस्य सचिवांकडे सादर करावा लागणार आहे. निवडणूक झाल्यावर अध्यक्ष किंवा सभापती विषय समित्यांसमोर त्या विषयावर कारवाई करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *