महाराष्ट्राच्या उत्तर भागातून माघारीची शक्यता; राज्यात पाऊस देणार उघडीप

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा उर्वरीत प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. वाऱ्यांच्या माघारीस पोषक स्थिती निर्माण झाल्याने शुक्रवारपर्यंत (ता.२३) महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घालणारा पाऊस उघडीप देण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

वायव्य भारतातील पश्चिम राजस्थानातून २८ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर ६ ऑक्टोबरपर्यंत संपुर्ण राजस्थानसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, अरबी समुद्राच्या काही भागातून वारे माघारी फिरले. मात्र त्यानंतरचा मॉन्सूनचा परतीचा प्रवास रेंगाळला होता. शुक्रवारपर्यंत (ता. २३) उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातसह महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

परतीच्या सुधारीत वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून देशातून माघारी जाणे अपेक्षित होते. मात्र बंगालच्या उपसागरातून आलेल्या वादळी प्रणालीमुळे परतीच्या काळात महाराष्ट्रात मॉन्सून सक्रीय झाला. उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, ते ठळक होऊन उत्तरेकडे सरकून जाणार आहे. गेले काही दिवस अक्षरशः धुमाकुळ घालणारा पाऊस शुक्रवारपासून उघडीप देणार असून, महाराष्ट्रासह देशभरातून मॉन्सून वेगाने परतण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *