कमी दाब क्षेत्र पोषक ठरण्याची शक्यता
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू असतानाच, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. त्यामुळे पोषक हवामान होत असल्याने शुक्रवारपासून राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रात शुक्रवारपर्यंत (ता.९) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या प्रणालीची तिव्रता वाढण्याची शक्यता असल्याने ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेशसह पूर्व आणि मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस हजेरी लावणार आहे. शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत (ता. १३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यात वादळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरात, अरबी समुद्रातून मॉन्सूनची माघार
पावसाने दिलेली उघडीप, हवेतील ओलावा (आर्द्रता) कमी झाल्याने मॉन्सूनने संपुर्ण राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागासह गुजरात, अरबी समुद्राच्या काही भागातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.