जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू असतानाच, राज्यात वादळी पावसाच्या ढगांची छाया पसरली आहे. शनिवारी (ता.१०) दुपारनंतर विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारपर्यंत (ता.१४) राज्यात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेली खरीप पिके सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
देशाच्या संपुर्ण वायव्य भागासह उत्तर भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. मॉन्सूनने संपुर्ण राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागासह गुजरात, अरबी समुद्राच्या काही भागातून माघार घेतली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. सोमवारपर्यंत (ता. १२) या प्रणालीचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डीप्रेशन) रूपांतर होण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली सोमवारी दुपारपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगणा, रायलसीमा, उत्तर कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यातच बुधवारी (ता. १४) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. बुधवारपर्यंत (ता.१४) राज्याच्या विविध भागात वादळी पावसासाठी पोषक स्थिती आहे. रविवारी (ता. ११) राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहे. बुधवारपर्यंत राज्यावर वादळी पावसाची छाया कायम राहणार आहे.
वादळी पावसाची शक्यता असलेले जिल्हे (स्त्रोत : हवामान विभाग)
रविवार (ता. ११)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगाली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.
सोमवार (ता. १२)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगाली, नांदेड, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.
मंगळवार (ता. १३)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगाली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम.
बुधवार (ता. १४)
पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, नगर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगाली, बुलडाणा, अकोला, अमरावती.