मुंबई : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.
या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची घरे पाण्यात बुडाली होती. घरांचे, घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी झोपड्याही नष्ट झाल्या होत्या.
जाहीर झालेल्या निधीमधून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमी व्यक्तींना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास किंवा त्याचे नुकसान झालेले असल्यास त्यासाठी सुमारे ८ कोटी ८६ लाख २५ हजार , अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे तसेच नष्ट झालेल्या झोपड्या यांना अर्थसहाय्य देण्यासाठी ७ कोटी १५ लाख रुपये, मदत छावण्या चालविण्यासाठी ४७ लाख रुपये असा एकूण १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे.