मुंबई : पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रीतीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातुन काम करावे. शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल, यासाठी ज्या पिकांना बाजारपेठ आहे तेच पिकले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करा, अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी संजीवनी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विकास रस्तोगी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कृषी संजीवनी प्रकल्प योजनेतून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्पाची देखील या प्रकल्पास जोडणी करावी जेणेकरून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करता येईल. बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

कृषिमंत्री भुसे म्हणाले, या योजनेंतर्गत सहभागी गावातील ३८०० गावांचा पाण्याचा ताळेबंद करण्यात आला आहे. त्यामुळे ते पीक पद्धतीत बदलासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला कायमस्वरूपी सबळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच या योजनेच्या सहभागी गावातील ५००० सरपंचांसमवेत वेबिनार आयोजित करून त्यांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील. क्षेत्रीयस्तरावर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केली. यावेळी श्री. रस्तोगी यांनी सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *