पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत. प्रशासनाकडून ऑनलाईन शाळा सुरू करण्यावर प्रयत्न केले जात आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्यासाठी पाचशे शाळांना स्मार्ट टीव्ही पुरवण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतुद केली असून त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे, अशी माहिती अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
स्मार्ट टीव्ही देण्यासाठी शाळांची पटसंख्या ही शंभरपेक्षा अधिक असली पाहिजे अशी अट शिक्षण विभागाने ठेवली होती. त्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी पटसंख्याची अट पन्नास करावी, कारण आदिवासी भागात विद्यार्थी संख्या कमी असते. त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांना देखील ई-लर्निंगद्वारे शिक्षण मिळण्यासाठी पटसंख्येची अटीमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी शाळांची शिफारस करण्यास सांगितले.
वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यामध्ये दृकश्राव्य पद्धती प्रभावी मानली जाते. या पद्धतीने अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांना फायदा होतो. स्मार्ट टीव्हीद्वारे इंटरनेटचा वापर करून मोबाईल टीव्हीला जोडून किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळे व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखवने शक्य होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात दोन कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यात पाचशे शाळांना याचा फायदा होणार आहे.