रविवारपासून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज
पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर होऊ लागले आहेत. शनिवारी (ता. २०) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारपासून (ता. २१) राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर पावसाळी वातावरण निवळताच गारठाही काहीसा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा पोषक ठरल्याने राज्यात मंगळवारपासून (ता. १६) अवकाळी पाऊस, गारपीटीने तडाखा दिला आहे. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, द्राक्षे, आंबा पिकाला तडाखा बसला आहे. शनिवारी (ता. १९) सकाळपासूनच राज्यात ढगाळ वातावरण होते. तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली.
रविवारी (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर होणार असून, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह आल्याने महाराष्ट्रासह मध्य भारतातील किमान तापमानात २ ते ४ अंशाची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शुक्रवारी (ता. १९) नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १६.३, जळगाव १४.०, कोल्हापूर १८.७, महाबळेश्वर ११.६, मालेगाव १४.८, नाशिक १४.५, सांगली १८.१, सातारा १६.८, सोलापूर १६.३, मुंबई (कुलाबा) २२.४, सांताक्रूझ २१.५, अलिबाग १६.६, डहाणू २०.६, रत्नागिरी २०.०, ठाणे २०.२, वेंगुर्ला १८.०, औरंगाबाद १६.२, बीड १५.७, परभणी १५.५, अकोला १७.५, अमरावती १५.१, बुलढाणा १६.०, चंद्रपूर १५.६, गोंदिया १४.६, नागपूर १३.९, वर्धा १४.२, यवतमाळ १६.५.