मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या ग्रामसभा पुन्हा सुरू होणार आहेत. कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करून ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. पण, दरम्यानच्या काळात कोरोना विषाणुचा नवा स्ट्रेन (प्रकार) आढळल्याने दक्षता म्हणून ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

ग्रामसभेच्या मंजुरीअभावी वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरुध्दातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे इत्यादी बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देखील आता कमी झाला असून जनजीवन पूर्ववत होत आहे. या बाबी विचारात घेऊन कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *