राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
पुणे : देशातील सर्व टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’ प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात स्थानिकांना सवलत असूनही स्वयंचलित यंत्रणेमुळे त्यांच्याकडून टोल वसुली होत आहे. याविरुध्द तातडीने कार्यवाही केली नाही तर आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख म्हणाले, टोलनाक्यांवर टोल वसुलीसाठी करण्यासाठी आता ‘फास्टॅग’ प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ही सुविधा वाहन चालकांसाठी चांगली असली तरी त्याबाबत पूर्ण तयारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे टोलनाक्यांवर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही रांगा लागत आहे. याबाबत सर्व टोलचालकांनी तातडीने कार्यवाही करावी.
खासगी वाहनचालकांना अनेक टोलनाक्यावर टोलमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी फास्टॅगमधून येथेही पैसे जातात. वाहनचालकांना हे पैसे गेल्यावर समजते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत भरारी पथके नेमून पाहणी करुन, तातडीने कार्यवाही करावी.
‘फास्टॅग’ नसलेली वाहने या मार्गिकेत आल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल केला जात आहे. त्यामुळे वादाचे प्रसंगही घडत असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत. याबाबत यंत्रणा तयार करून वाहनचालकांना होणारा मनस्ताप कमी करावा, असे देशमुख यांनी म्हटले आहे.