पूर्व किनाऱ्याला आज धडकणार चक्रीवादळ ; तामिळनाडू, पदुच्चेरी, आंध्रप्रदेशला इशारा
पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेले अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याकडे झेपावत आहे. बुधवारी (ता. २५) रात्री उशीरापर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळी प्रणालीमुळे पूर्व किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली असून, जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली आहे. ‘निवार’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही प्रभाव जाणवणार असून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. अग्नेय अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडील सोमालिया देशाकडे सरकताना त्याचे ‘गती’ चक्रीवादळात रूपांतरण झाले. हे वादळ सोमालियाच्या रास बिन्नाहजवळ निवळून गेले. ‘गती’ तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.२४) ‘निवार’ चक्रीवादळ तयार झाले आहे.
‘निवार’ चक्रीवादळ बुधवारी (ता. २५) सकाळी कुड्डलोरपासून २९० किलोमीटर, पदुच्चेरीपासून ३०० किलोमीटर, तर चेन्नईपासून ३५० किलोमीटर अग्नेयेकडे समुद्रात घोंगावत होते. ही प्रणाली बुधवारी मध्यरात्रीपर्यंत तामिळनाडू आणि पदुचेरीच्या कराईकल आणि ममल्लापूरमलगत किनाऱ्याला धडकून कर्नाटककडे सरकत जाण्याचे संकेत आहेत.
हे वादळ किनाऱ्याला धडकताना अतितीव्र होऊन ताशी १२० ते १४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू राज्यात पावासाचा फटका बसणार आहे. फळबागा आणि किनाऱ्यालगतच्या शेती पिकांचे नुकसान होणार आहे. कच्ची घरे, विजेचे खांब, झाडे पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावरही उंच लाटा उसळून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात ढगाळ हवामानसह पावसाची शक्यता
ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय असल्याने दक्षिण भारतातील राज्यामध्ये पाऊस पडत आहे. यातच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळे निर्माण झाल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतिक्षा आहे. ‘निवार’ वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे गुरूवार (ता. २६) ते शनिवार (ता. २८ ) या काळात विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.