राज्यात थंडीची चाहूल ; चंद्रपूर ८.२ अंशांवर
पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली लागली आहे. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ येथे तापमान दहा अंशांपेक्षा खाली घसरले आहे. मात्र पुर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे किमान तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता असल्याने कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
मॉन्सून परतल्यानंतर उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येण्यास सुरवात झाल्याने राज्यात सकाळच्या वेळी गारठा जाणवत आहे. तर दुपारी उन्हाचा चटका काहीसा वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ८.२ अंश तर, यवतमाळ येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. यावरून उत्तरेकडील राज्यातही अद्याप थंडीचा कडाका कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.
विदर्भात किमान तापमानाचा पारा ८ ते १४ अंशांच्या दरम्यान आहे. तर मध्य महाराष्ट्रात ११ ते १५ अंश, मराठवाड्यात १० ते १६ अंश, कोकणात १९ ते २३ अंशाच्या दरम्यान आहे. पुढील काही दिवस पुर्वेकडून वारे वाहणाची शक्यता असल्याने राज्याच्या तापमानात चढ-उतार होणार आहे. तर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.३, जळगाव १२.०, कोल्हापूर १६.०, महाबळेश्वर १३.६, मालेगाव १३.२, नाशिक ११.८, सांगली १४.५, सातारा १२.८, सोलापूर १३.०, मुंबई (कुलाबा) २२.५, सांताक्रूझ १९.२, रत्नागिरी २१.०, डहाणू २१.३, औरंगाबाद १२.५, बीड १५.४, उस्मानाबाद १४.०, परभणी १०.१, नांदेड १३.७, अकोला १२.७, अमरावती १२.५, बुलढाणा १३.८, ब्रम्हपुरी १३.२, चंद्रपूर ८.२, गोंदिया १०.५, नागपूर ११.५, वाशीम १२.६, वर्धा १२.४, यवतमाळ ९.५.