मुंबई : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला आहे. त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, यासंदर्भात खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा केली. कांदा निर्यात बंदी तातडीने हटवण्यासाठी केंद्र सरकारकडे पवार स्वतः प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असतांना केंद्र सरकारने अचानकपणे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असतांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून केंद्र सरकारकडे बाजू मांडली जाणार आहे.

त्यानुसार केंद्र सरकारबरोबर खासदार शरद पवार हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्वतः मध्यस्थी करत असून तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *