पुणे : शहरातील २५० हुन अधिक गणेशमंडळांचा सक्रिय सहभाग घेऊन गणेशोत्सव ते नवरात्र उत्सव पर्यन्त सुरु राहणा-या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे. या आरोग्यत्सोवाची सुरुवात आजपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ येथून झाली.

उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, पर्यावरण तज्ञ नितीन देशपांडे, दत्तात्रय देवळे, ललित राठी, लोकेश बापट, माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, पतित पावन संघटनेचे योगेश वाडेकर, यादव पुजारी, विकी आंग्रे, विजय जोरी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, परेश खांडके, मनीष घरत, श्रीकांत मेमाणे उपस्थित होते.

माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले कि, उत्सवाच्या कालावधीत जमा झालेले निर्माल्य – हार – नैवद्य यांचे संकलन करून पुणे मनपा च्या सहकार्याने सेंद्रिय पद्धतीने खतनिर्मिती करुन पुन्हा अशा मंडळांकडे देऊ, हे खत त्यांनी नागरिकांना झाडांसाठीचा नैवैद्य म्हणून मंडळांकडून प्रसाद देण्याचे आवाहन घरत यांनी केले आहे. तसेच १० टन टाकाऊ प्लास्टिक संकलन करण्याचा उपक्रम आणि रिसायकल प्लास्टिक डस्ट बिन चे वाटप करण्यात येणार असल्याचे घरत म्हणाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव आणि सदस्य सचिव इ. रविंद्रन यांनी या आरोग्योत्सवासाठी मोलाची मदत केल्याने त्यांचे आभार यावेळी घरत यांनी मानले.

पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले कि, पुणे मनपा दरवर्षी निर्माल्यापासून खत बनवत असते, गेल्यावर्षी अशा निर्माल्यापासून तर अगरबत्तीदेखील बनवण्यात आली होती. या गोष्टी पुन्हा मंडळांना आणि नागरिकांना देण्यात येतात. अशा समाजपयोगी गोष्टींमध्ये गणेशमंडळे आणि सोसायट्यांनी तसेच नागरिकांना सहभाग घेण्याची गरज असल्याचे मोळक म्हणाले. नागरिकांनी आपापल्या घरि गणपतीचे विसर्जन करावे, ते जमत नसेल तर मुर्ती दान करुन पर्यावरण रक्षण करण्यास हातभार लावण्याचे आवाहन देखील मोळक यांनी केले.

नागरिकांना घरी गणपती विसर्जन करण्यासाठी महानगरपालिका अमोनियम कार्बोनेट मोफत देते, तसेच ज्यांना मुर्ती दान करायची आहे अशांसाठी मनपाच्यावतीने विधीवत पूजा करुन विसर्जन करण्यात येते. मुर्तीदानासाठी शहरामध्ये १८७ केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. नागरिकांनी उत्सवाच्या काळात अशा सामाजिक संस्था आणि मनपाला सहकार्य केले तर निश्चित पर्यावरणाचे रक्षण होईलच तसेच कोरोनाचादेखील प्रादुर्भाव कमी होईल असा विश्वास यावेळी उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केला.

उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे म्हणाल्या कि, उत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी निर्माल्य, नैवेद्य विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. पावसाळ्यात यामुळे अनेक ठिकाणी गटारे, चेंबर, कॅनॉल तुंबलेले दिसतात, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळायच्या असतील तर निर्माल्य कलशचा अधिकाधिक वापर नागरिकांनी करण्याचे आवाहन शेंडगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *