ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय
पुणे : ग्रामीण भागातील कोरोना संशयित किंवा बाधित व्यक्तीला तात्काळ आरोग्य सुविधा मिळावी. प्रशासन आणि नातेवाईक यांच्या समन्वय असावा. अत्यवस्थ रुग्णाला शहरातील रूग्णालयात तात्काळ बेड उपलब्ध होवून उपचार मिळावे, यासाठी प्रत्येक रूग्णालयात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झापाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बाधित व्यक्तीला रूग्णालयात बेड उपलब्ध होणे. त्याचे ऍडमिशन आणि डिस्चार्ज तसेच अन्य व्यवस्थेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नियंत्रणाखाली “रूग्णालय व्यवस्था सनियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आले. ग्रामीण भागातील बाधित व्यक्तीला तालुक्यातच चांगले उपचार मिळावे यासाठी प्रत्येक तालुक्यात कोवीड रूग्णालयात उभारण्यात आले आहे. त्यानुसार संशयित व्यक्तींची तपासणी, सौम्य लक्षणे असलेल्या बाधित यांना याठिकाणीच उपचार दिले जात आहे. अत्यवस्थ असेल तरच शहरातील किंवा जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेले बड्या रूग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे.
बाधित व्यक्ती रूग्णालयात दाखल झाल्यापासून त्याला घरी सोडेपर्यंत रूग्णालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि रूग्णांचे नातेवाईक यांच्यात समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोरोना संशयिताची तपासणी करण्यापासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अहवाल निगेटीव्ह आल्यावर त्याला घरी सोडणे, बाधित असल्यास त्याची लक्षणे लक्षात घेऊन सेंटरमध्ये उपचार देणे, लक्षणे तीव्र असल्यास जिल्हा किंवा उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करणे. उपचार सुरू असताना, देखरेख करणे, नोंदी ठेवणे त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रत्येक रूग्णालयात दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. दरम्यान, नेमूण दिलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ रूजू व्हावे, असा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.